Wednesday 8 October 2014

एक पत्र शाळेकडून....!!!

एक पत्र शाळेकडून....




हे पत्र खूप दिवसांपूर्वी लिहिलं होतं. शाळेतल्या मित्रांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी द्यायचा बेत होता. पण हे पत्र त्या सर्व मित्रंपर्यंत पोहचलं नाही. कारण बरेच मित्र हे शाळा सोडल्यानंतर भेटलेच नाही. तेच पत्र त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न. या पत्रामध्ये खूपसारे बदल करून आज हे पत्र तुमच्यासमोर मांडतोय…  


ओळखलस का मला ??  खूप दिवसापासुन तुझ्याशी बोलायची इच्छा होती.  पण जसा तुला वेळ होत नाही तसा मलाही झाला नाही.  आणि हे असं किती दिवस चाललं असतं बोलायची इच्छा असताना तुझ्यापासून लांब राहायचं.  म्हणून आज वेळ मिळाला तर वाटलं बोलाव तुझ्याशी… थोडा वेळ काढ माझ्याशी बोलायला… 


अरे माझ्यात काही बदल झाले काही काळाने केले. बदल म्हणजे तुझी शाळा आहे तशीच आहे. फ़क्त तुझ्या तुकड्यांच्या जागी हाऊस झालेत. असेच काही छोटे मोठे बदल. काळाबरोबर तु पण बदलतोस मग मला नको बदलायला. जशी वेळ निघून गेली तसा तू मोठा झाला आणि मी काळानुसार म्हातारी झाले.  


पण मी सुधा आता Modern झालीये. छान असे रंग दिलेत मला. प्रत्येक वर्गात एक नवीन फळा, नवीन बाकडी. सर्वकाही नवीन पण तुझ्याबरोबरच्या जुन्या आठवणीच जास्त आठवतात.   


तुला आठवत आहे का ती ६ वर्ष आपण एकत्र घालवलेली. ती ६ वर्ष जेवढी तुझ्या लक्षात नसतील तेवढी माझ्या लक्षात आहेत.  तुझं ते ५वी मध्ये प्रवेश करतानाच पहिलं पाऊल, त्या पाचवीच्या वर्गातले पहिले मित्र  आणि त्या मनातली ती भिती फ़क्त मीच ओळखु शकते. १० वी झाल्यावर त्याच शाळेतुन जातानाची मनस्थिती फ़क्त मीच समजू शकते. कारण तु जाताना माझी मनस्थिती पण तशीच होती. फक्त मला भावनांना बाहेर दाखवता येत नाही. त्या शाळेच्या कोपऱ्यात लपून ठेवलेल्या आहेत.  


त्या बेंचवर जेथे तु बसायचा तेथे तु एका कोपय्रात तुझं नाव कोरून ठेवलय ते अजुन तसचं आहे. त्याच बेंचवर तु पेनगेम खेळायचा. त्याच बेंचवर हाताने ढोल वाजावायचा. मला माहित आहे सगळं. त्या बेंचकडे बघितलं की तुझी आठवण येते. पण तो बेंच दिवसेंदिवस जुना होत चाललाय. काही दिवसांनी त्याची माझ्यासारखी अवस्था होईल त्यावर नवीन फळ्या बसतील तुझी नाव कोरलेली फळी काढून टाकली जाईल. असं असलं तरी माझ्या मनातली आणि तुझ्या मनातली माझी जागा कोणी पुसू शकणार नाही.    


आठवतयं तुला ते फ़रशीचं मैदान, जेथे तु फ़रशीने, कधीतरी रबरी चेंडुने खेळायचास..? तिथेच १५ August ला झेंड्याला वंदन करून उभा असायचा. त्यावेळेस तुझ्या डोळ्यातून जे पाणी यायचं जांभळी देताना ते पण मला माहीत आहे. परत २६ जानेवारीची प्रजासत्तकाची परेड, तिकडचं Football खेळणं, PT च्या तासाला टाईमपास करणं आणि केस कापलेले नाही म्हणून सरांचा मार खाणं. परत प्रयोग शाळा तर राहीलीच. तिकडे तु तर काय कल्ला घालायचास कारण तिकडे बघणारं कोणीच नाही ना....? पण माझं तुझ्या सगळ्या गोष्टिंकडे मनापासुन लक्ष होतं. खुप आठवण येते तुझी… पण परत पुढे शिकायला येणाय्रा तुझ्या छोट्या भावांची जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यांच्याबरोबर पण मला या सुंदर आठवणी जगायची खूप मोठी संधी आहे आणि यापुढेही असेल.     


मला माहित आहे कि सध्या शिक्षण आणि नोकरी यांसारख्या गोष्टिंमुळे तुला वेळ देणं शक्य होत नसेल कदाचित. सगळं व्यवस्थित चाललयं तुझ, कधीतरी एकदा तुला माझी आठवण नक्की येत असेल. तर माझ्यासाठी थोडा वेळ काढून भेटायला येत जा.  शाळेत असताना तु मला खुप प्रेम दिलयं. मला सुद्धा आठवण येते तुझी. तुझ्या त्या आठवणींचाच तर मला आधार आहे.  आता तु खुप मोठा झाला असशील. वर्षातून एकदा तरी माझी भेट घेत जा. मला पण वाटतं कि माझ्या मित्राने मला भेटावे. हि एक माझी इच्छा आहे.  Hope so तु पुर्ण करशील. मी वाट बघत आहे तुझी. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा..!!!

© ओंकार शिंदे 
८ ऑक्टोबर २०१४ 

Wednesday 1 October 2014

आयुष्य जगायच कसं शिकवणारं अनोख नातं...!!!




आपल्या आयुष्यामध्ये  खूपसारी नाती येतात. काही नाती गळ्यात मारली गेलेली असतात तर काही नाती आपण स्वतः बनवलेली असतात. प्रत्येक नात्याचा ओलावा हा वेगवेगळा असतो. 

असच एक नातं… तसं म्हंटल तर ते लहानपणापासून खूप जवळचं आहे आणि याच नात्याने शिकवल की आयुष्य जगायचं कसं… आयुष्याच्या प्रयेक पायरीवर या नात्याचा एक वेगळा असा पाठ उलगडत गेला. हे नात म्हणजे माझा मावस भाऊ आणि वहिनी… 

प्रत्येक पायरीवर या नात्याचा ओलावा वाढतच गेला. या दोघांनी आयुष्यात प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर हे दोघ आपला ठसा उमटवत गेले. त्या दोघंविषयी काहीतरी मनातून वाटतंय तेच मांडायचा प्रयत्न करतोय. माहित नाही योग्य तो न्याय देऊ शकेल की नाही… 

पाहिलं मी माझ्या भावाविषयी बोलतो. माझा भाऊ मी त्याला भाई म्हणतो. वयाने तसा तो बराच मोठा आहे तरी अजून एक मोठा भाऊ नसून एक जवळचा मित्रच म्हणून राहतोय. खूप कमी लोक असतात जी वयाने मोठी असली तरी लहानाला मित्रासारखे वागवतात. लहानपणापासून खूप कष्टात दिवस काढले त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर फक्त त्याला हवं तेवढ यश कधीच मिळू शकल नाही. या अपयशाला कदाचित त्याच्या नशीबाची साथ असेल. एवढ असून सुद्धा मी त्याला कधीच खचताना पाहिलं नाही. प्रत्येकक्षणी त्याचे प्रयत्न हे चालूच असतात काही ना काही करण्यासाठी…   

माहित नाही काय आहे हा प्रकार… त्याचा विचार कधीच मनातून सुटत नाही. इतरांना मदत करतो पण स्वत: त्रास सहन करेल. कदाचित हा मूर्खपणा वाटत असेल कि स्वत: त्रास सहन करून इतरांना मदत करणं. पण स्वार्थी विचार न करणारे माणसं खूप नशिबाने मिळतात. आज असे खूप जण आहेत की ज्यांना वाटतं की मला याच्यासारखा बाप, मित्र, भाऊ असावा ( कदाचित कोणी तोंडावर बोलणार नाही ) पण काहीही नसताना इतरांच्या मनात राहणारा एक आदर्श भाऊ मला मिळाला. या नात्याच्या मला अभिमान असण्यापेक्षा आदर जास्त आहे. कारण याच नात्याने सर्वात पहिल्यांदा समाधान, आनंद, कष्ट, आणि Compromise या शब्दाचा खरा अर्थ शिकवलाय   

दुसरी व्यक्ती म्हणजे माझी वहिनी… "म्हणजे माझ्या वहिनी"… अहो जाहो करणं गरजेच नाहीये खरतर पण तेवढा आदर कमीच आहे त्यांच्या योग्यतेसुसार… एक सुंदर अश्या घरातून आमच्या घरात पाउल टाकणारी एक खूप जवळची बहिण किंवा मैत्रीण म्हणू शकतो. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर यांनी माझ्या भावाला साथ दिली. आयुष्यात प्रत्येक कष्ट प्रत्येक अडचणीत त्यांनी कधी साथ सोडली नाही.

त्यांच्याविषयी काही ओळी आहेत त्याच बरच काही बोलून जातील त्यांच्याबद्दल

तुला विहिनी म्हणू की ताई
तुझी माया म्हणजे जणू आई

कधी वाटलच नाही तु दुसऱ्या घरातली
चांगली मैत्रीण तु आमच्या मनातली

स्वाभिमान म्हणजे काय हे तुझ्यामुळे कळालं
आम्हा सगळ्यांना माणुसकीच प्रेम मिळालं 

इतरांची स्वप्न तू स्वतःच्या नजरेतून पाहीली
स्वतःची स्वप्न पुर्ण करायची राहीली

अडचणीत तु कधी हात सोडला नाही
स्वप्न संपत चालली होती तरी तु ध्यास सोडला नाही

असं नेहमी वाटतं आयुष्यात खुप दुःख आहे
तुझ्याकडे बिघतलं की कळतं या दुःखातही सुःख आहे

तुझ्याकडे बिघतलं की मन शांत होतं
जसं आईच्या कुशीत बाळाचं होतं

खुप काही बोलता येईल तुष्याविषयी ताई
खरंच तुझी माया जणू माझी आई


मन अस्वस्थ झालं की या दोघांच्या चेहऱ्याकडे बघितला की मन शांत होतं.हे नात खूप हवहवस वाटतं. काय आहे या नात्यात त्रुणानुबंध, प्रेम का ओढ? काहीच कळत नाही आणि आपलं मन पण आपल्याला काहीच कळू देत नाही. मनात काही नसताना पण बरच काही असतं असं वाटतं. जेवढा दुर असतो. तेवढाच प्रेमाचा ओलावा वाढत असतो. 

आज या नात्याविषयी लिहावस वाटलं… खुपवेळा असं होतं कि मनातून खूप बोलायचं असता पण बोलत येत नाही आणि खूप सारी नाती ही मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक जागा करून राहतात… ती मनातली गोष्ट माझ्या काही जवळच्या लोकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न… कदाचित हे खूप वाचायला कंटाळवाण असेल… पण कोणाचातरी आदर्श ठेवणं त्यापेक्षा आदर्श व्यकतीच आयुष्यात असण्यासाठी खूप नशीब लागतं यामधून एवढच सांगायचय… 

सगळ्यात महत्वाच यांच नाव महेंद्र भाई आणि सीमा वाहिनी

© ओंकार शिंदे 
१ ऑक्टोंबर २०१४
  

Tuesday 18 February 2014

जानेवारी मधले खड्यातले पुणे....!!!



पुणे गेलं खड्यात किंवा खड्यातले पुणे असं वर्तमानपत्रात येणारी पावसाळयातील बातमी आपण नेहमीच बघत असतो. ही बातमी येते तो महिना साधारण सप्टेंबर महिना असतो. कारण आधीचे तीन महिने पाऊस पडलेला असतो आणि त्याचे हे सर्व परिणाम असतात. दर वर्षी वर्तमान पत्रात येणारी ही बातमी, कधी येते आणि कधी जाते कळतंच नाही. पुण्यामधील काही गणेशोत्सव मंडळांनी तर देखाव्याद्वारे या गोष्टींना वाचा फ़ोडायचा पण प्रयत्न केला होता.

सध्या चक्क जानेवारी मध्ये पुण्यामधल्या रस्त्यांना खड्डे पडलेत. आणि खड्डे पडायला तसा पाऊस पण नाही पडलाय पुण्यामध्ये परंतु तरीही खड्डे पडलेत. एक प्रकारचं आश्चर्य झालंय. खुप लोकांना कदाचित जाणवलं पण असेल. हे जे काही खड्डे पडलेत ते पुण्याच्या प्रत्येकी एक कि.मी च्या परिसरात पसरलेत. त्याला कारण म्हणजे जवळ आलेल्या निवडणुका. 

आज पुण्यातल्या खूप प्रभागामध्ये रस्त्यांची दुरुस्तीची कामे, ड्रेनीज पाईप, वायरिंगची कामे चालू आहेत. ज्या ज्या प्रभागात ही कामे चालू आहेत ती कामे कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या पदाच्या निधीतून चालू आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बहूतेक या रस्त्यांसाठी दिले जाणारे निधी हे फक्त जानेवारी महिन्यातच आलेले आहेत. 

शनिवार पेठ, प्रभात रोड, नीलायम चौक अश्या पुण्यातल्या अनेक रहदारीच्या आणि गर्दी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी सध्या ही सगळी कामे चालू आहेत. आता जानेवारी महिन्यात एकाचवेळी पुण्याच्या रहदारीच्या आणि गर्दी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेत त्याच कारण तर साहजिकच आहे कि निवडणुका जवळ आल्या आहेत आणि आता आमचा पक्ष सरकारने दिलेल्या निधीतून ही सामाजिक कामे करत आहे हे दाखवायचे आहे आणि जनतेला दाखवायचं कि आम्ही किती कामे केली. आत्ताही तुम्ही खूप ठिकाणी कामं चालू असतील आणि बघायला गेलात तर कळेल की जवळपास प्रत्येक ठिकाणी काही ना काही बोर्ड लावलेत. 

" माननीय ............. यांच्या निधीतून अमुक अमुक दुरुस्तीचे काम चालू आहे."

त्यांनी केलेल्या या कामांचा ते आपल्या अहवालात उल्लेख करतात. खरच अशी काही प्रकारची केलेली कामे आहेत का? ज्याचा समाजाला हवा तितका फायदा झाला असेल? आज हा सरकारने दिलेला निधी फक्त या ड्रेनीज पाईप, वायरिंग, रस्ता दुरुस्ती यासाठीच फक्त वापरायचा असतो का ? हा एक प्रश्नच आहे कि फक्त याच कारणासाठी निधी दिला जातो का ? 

असे काही नेते असतील सुद्धा कदाचित ज्यांनी समाजासाठी सरकारने दिलेल्या निधीतून अनेक वेगळी  कामे केली देखील असतील पण सामान्य माणसाला या गोष्टींचा आढावा कसा मिळणार हा प्रश्नच आहे.
  
पुण्यातील एका परिवर्तन नावाच्या संस्थेने मागील विधानसभेच्या निवडणुकेच्यावेळी पुण्यामधील नगरसेवक आणि त्यांनी यासंबंधी असणाऱ्या निधी कसा वापरला याचं एक छान प्रगतीपुस्तक तयार केलं होतं. त्यामध्ये प्रत्येकाच्या केलेल्या कामासंबंधीचा आढावा त्यांनी घेतला होता. 


या साईटवर गेल्यावर तुम्हाला नगरसेवक आणि त्यांनी केलेल्या कामाचा आढावा मिळेल. हा आढावा २०१२-२०१३ मधील आहे. 

पण फक्त यामध्ये रस्ता दुरुस्ती आणि ड्रेनीजची कामे सोडून दुसरी कामे करणारे पण काही नगरसेवक आहेत. 

कदाचित हे रस्त्याला खड्डे पाडलेले चित्र पुढच्या निवडणुकीपर्यंत बदललेले असेल आणि कमीत कमी पावसाळ्यात तर नाही परंतु निवडणुकांच्या वेळी खड्यातल्या पुण्याचे चित्र वेगळे असेल.  


© ओंकार शिंदे
१८ फेब्रुवारी २०१४

Saturday 1 February 2014

मुंबईचं स्पिरीट का मुंबईची गरज...!!!


काही दिवसापूर्वीच मुंबईला जाणं झालं. मुंबईला जाताना मी जाण्यासाठी तसा एस टी ने गेलो होतो. जाताना ठाणे पर्यंतचा प्रवास खूप छान झाला. ठाण्याला आल्यानंतर आता आपण मुबईमध्ये शिरत असल्याची जाणिव झाली. नुसती ती गर्दी आणि पुण्यातून रिकामी असलेली एस टी अचानक एका क्षणात भरली. रस्त्याने असणारी वर्दळ काही केल्या कमी होताच नव्हती ठाण्यामधून पुढे प्रवास सुरु झाला. रस्ता ओलांडून पुढल्या प्रवासासाठी जायचं होतं. त्यासाठी एका पुलाची व्यवस्था केलेली होती आणि विशेष म्हणजे त्या पुलास जोडणारे दोन रस्ते होते एक म्हणजे रेल्वे प्रवास करून आलेल्या लोकांसाठी थेट रेल्वेच्या प्ल्याटफॉर्मकडून आणि एक होता तो रस्त्याच्या बाजूने आलेल्या पादचाऱ्यांसाठी. त्या पुलाच्या खालच्या बाजूला एक रिक्षाच वाहनतळ होतं आणि त्या रिक्षा मुंगीच्या चालीने हळू हळू पुढे सरकत होत्या. आमची गाडी हालली आणि जाता जाता मुंबई मधल्या घोडबंदर परिसरात मला वाहतूक  कोंडी मिळाली. एकंदरीत आता खऱ्या प्रवासाला सुरवात झाली होती.

प्रवास थांबला तो माझा वसई रोडला माझ्या बहिणीच्या घरी. तिकडे थांबून मला एका मैत्रिणीच्या लग्नाच्या रिसेप्शनला जायचं होतं. ते लग्न होतं बोरावलीला. वसई रोड पासून एक ८ ते १० स्टेशन पुढे असेल. एकटा असल्यामुळे वसई रोड वरून बसने जाता येईल का ते बघितलं पण ते शक्य नव्हतं. म्हणून शेवटी नाईलाजाने मला लोकलने ( रेल्वेने ) जावं लागलं. लोकलने जायचा कंटाळा असं काही नाही, परंतु खूप वर्षापूर्वी केलेला लोकलचा मुंबईचा प्रवास आज नको होता आणि आता काही दुसरा पर्याय पण नव्हता. संध्याकाळी आम्ही ५:३० च्या सुमारास वसई रोड येथून लोकल पकडली आणि विशेष म्हणजे त्या लोकल मध्ये आजिबात गर्दी नव्हती. आणि एक ६: ३० च्या सुमारास आम्ही बोरिवलीला पोहचलो . 

बोरिवलीला पोहचल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आलो. आम्ही रिसेप्शनच्या कार्यालयाचा पत्ता शोधू लागलो. तिकडे जाता जाता एक काका दुकानात फोन वर बोलत होते. त्यांच्या दुकानाच्या जवळ गेलो आणि त्यांचा फोन बंद झाल्यानंतर काकांना पत्ता विचारला. काकांनी पत्ता असा सांगितला " यहासे सिधे जाओ, और बाये मुडो" काकांना विचार काही जवळची खुण सांगू शकता का ? काका अचानक चिडले आणि म्हणाले " मै यहा पता बताने के लिये नही बैठा हुं, आगे जाके किसीको पुछो " आणि एकंदरीत काकांचा असं बोलणं ऐकून आम्ही पुढे गेलो. पुढे आम्हाला पत्ता मिळाला आणि आम्ही कार्यालयावर पोहचलो. कार्यालयावर पोहचल्या पोहचल्या बघितलं तर काय फक्त आमच्या पूर्वी ४ लोक येउन बसले होते आम्ही पोहचलो संध्याकाळी ६;४५ च्या सुमारास. रिसेप्शनची वेळ होती संध्याकाळी ६ ची. अजूनही नवरा बायको आले नव्हते त्याला कारण ते विरारच्या जवळपास मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकले होते. आता कमीत कमी लग्नाच्या दिवशी तरी नवरा बायको यांनी कारने तरी यायला पाहिजे ते लोकलने कसे येणार...?? आज त्यांनी कारने येणं हि त्यांची गरज होती. त्याचा परिणाम असा झाला की संध्याकाळी ६ वाजता सुरु होणारं रिसेप्शन रात्री ८:४५ ला सुरु झालं. उशीर झाल्यामुळे आम्ही त्यांना भेटलो आणि लगेच निघालो. 

येताना बोरीवली रेल्वे स्टेशन वर लोकल लागलेली होती. आम्ही आतमध्ये शिरलो. त्यानंतर ५ मिनिटामध्ये लोकलचा डब्बा पूर्ण भरला आणि आता आतमध्ये चेंगरा चेंगरी सुरु झाली. पुढच्या प्रत्येक स्टेशनवर लोकलमध्ये गर्दी कमी होण्यापेक्षा वाढतच चालली होती. भाईंदरच्या स्टेशन वर काही लोकांचा घोळका आत शिरला आणि हा घोळका कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आतल्या गर्दीला अजून आत रेटत होता. माझ्याबरोबर माझी ताई पण होती. त्यामुळे या गर्दीचा त्रास काय होत होता ते माझं मलाच माहित. नंतर कळलं कि भाईंदर मध्ये असणारी लोकल काही कारणास्तव कॅन्सल झाल्यामुळे एवढी गर्दी वाढली. शेवटी आम्ही एका माणसाच्या मदतीने मार्ग काढत त्या  लोकलमधून बाहेर पडलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीचा अनुभव घेऊन मला परत  लोकलने प्रवास करायचा होता. त्यासाठी मी आता लोकलमध्ये शिरल्यानंतर दाराच्या जवळ उभा राहिलो जेणेकरून जास्त आत ढकलल्या जाणार नाही. माझं थांबायचं मीरा रोड हे स्टेशन जसं जवळ आलं तसं लोकल थांबण्याआधीच प्रवाश्यांनी प्ल्याटफॉर्मवर उड्या मारल्या कारण मीरा रोडच्या स्टेशनवर खूप गर्दी होती आणि या गर्दीने मला आत लोटू नये म्हणून लोकल थांबल्या थांबल्या मी लगेच बाहेर पडलो. आणि एक सुटकेचा नि:श्वास सोडला.

आजही त्या लोकलचा डब्बा तसाच भरलेला आहे ती लोकांची गर्दी तशीच लोकलमधल्या त्याच गर्दीला आत रेटत आहे आणि आतली माणसं त्या गर्दीतून बाहेर येण्याचा एक मार्ग शोधत आहेत. मुंबई मध्ये याआधी ज्याकाही घटना घडल्या त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सर्व लोक परत आपापल्या कामाला लागलेले दिसतात आणि याला मुंबईचं स्पिरीट म्हणून बोललं जातं. खरच हे मुंबईचं स्पिरीट आहे का मुंबईची गरज आहे...??

त्या दोन दिवसातली, पूर्वीची लोकल सुटल्यामुळे दुसऱ्या लोकलमध्ये जागा नसताना शिरणारी लोकं, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता लोकल चालू असताना प्ल्याटफॉर्मवर उड्या मारणारी लोकं, तशीच डोळ्यासमोर आहेत.

माझा हा प्रवास फक्त दोन दिवसापुरताच होता. त्या दोन दिवसात मुंबईकरांची होणारी धावपळ, गर्दीतून पहिल कसा बाहेर पडता येईल याचा प्रयत्न, लोकलचा प्रवास कसा व्यवस्थित करता येईल, या गोष्टींचा एक वेगळाच अनुभव आला.

हे सर्व लोक ज्यावेळेस वेळेपेक्षा पुढे धावण्याचा प्रयत्त्नातून बाहेर पडतील त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान बघण्यासारखं असेल. फक्त मनापासून एक इच्छा आहे कि मुंबईच्या गरजेला मुंबईचं स्पिरीट म्हणून चादर घातली जाऊ नये. मुंबईच्या कुठल्याही सामान्य माणसाने या गोष्टीचा विचार केला तर कदाचित त्याला त्याचं खरं उत्तर मिळू शकेल.

© ओंकार शिंदे 
१ फेब्रुवारी २०१४

Wednesday 15 January 2014

मनावरचं ओझं, मनाजवळच्या माणसाचं.....!!!



टाईमपास मराठी चित्रपट बघितला. त्या चित्रपटातलं एक वाक्य खूप आवडलं.  

"तू शिकलीस पण तुला बोलता येत नाही

मी नाही शिकलो पण मला बोलता येतं"

आजकाल असं खूपवेळा होत नसेल का ?? 

मनातल्या काही गोष्टी बोलायच्या असतात, सांगायच्या असतात, स्वतःची बाजू मांडायची असते, स्वतःची परिस्थिती समजावून द्यायची असते.पण होत उलटच. मनातल्या गोष्टी मनातच राहतात, सांगता येत नाही, बोलता येत नाही, स्वतःची बाजू मांडता येत नाही, आणि परिस्थिती, ही गोष्ट तर कोणी कधी कसं समजून घेईल हे सुद्धा माहित नाही

आपल्या मनात खूप काही असतं , काहीना काही भावना असते. तो राग असो किंवा प्रेम असो. मनात या गोष्टी खूप आतपर्यंत रुतलेल्या असतात. फक्त या गोष्टी आपणास बोलता नाही आणि त्याला कारण म्हणजे नात तुटण्याची भीती असो किंवा कोणासमोर वाईट व्हायचं नाही असा मनातला विचार असो. (खूपवेळा हा दुसरा विचार मनात असतो.) मनातली ती भावना आत अजून खोलपर्यंत रुतत जाते. आपण फक्त त्या व्यक्तीसमोर आल्यावर त्या भावनांना आवर घालतो.  

त्या व्यक्तीबद्दलचं प्रेम किंवा राग मनात वाढतच जातो. जी व्यक्ती एकेकाळी आपल्या मनाच्या खूप जवळ होती त्या व्यक्तीशी बोलणं वेळेनुसार अवघड होऊन जातं. एक दिवस मनात होणारी घुसमट वाढत जाते आणि त्या भावना कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या व्यक्तीसमोर Express केल्या जातात. आणि आता चर्चा सुरु होते त्या भावना व्यक्त केलेल्या व्यक्तीविषयी...!!!

"अरे हा काय फालतूपणा आहे ? ती व्यक्ती असं का बोलली ? मला असं कधी वाटलं नव्हतं कि असं काही होईल ?" अश्या अनेक प्रश्नांवर चर्चा व्हायला सुरवात होते. काही वेळेस असे तर्क सुद्धा लावले जातात की या व्यक्तीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमुळे त्या व्यक्तीने असा फालतूपणा केला. 

त्यानंतर त्या व्यक्तीला तुच्छ असल्यासारख वागवलं जात. त्या व्यक्तीला स्वतःपासून वेगळं केलं जातं. त्या व्यक्तीने काही गुन्हा केलेला असतो का ? दोन व्यक्ती एकमेकांच्या खूप जवळच्या असतात त्या दोघांमधल्या एका व्यक्तीने आपल्या भावना स्पष्ट सांगितल्या. तर त्या व्यक्तीने त्या नात्याविषयी प्रामाणिकपणा दाखवला असं वाटत नाही का ? 
  
आजकाल दोन जवळच्या व्यक्तीमध्ये समोरची व्यक्ती काय विचार करत आहे हे समजत नाही, म्हणजे या दोन्ही व्यक्ती एकमेकांना फसवत नाही का ? असं असूनही ती व्यक्ती परिस्थिती समजावून सांगत असते, तरीही त्या गोष्टी समजून घेतल्या जात नाहीत.  

जर कोणी आपल्या भावना सांगत असेल तर ती व्यक्ती चुकीची ठरते. कारण असं काही घडणं अपेक्षित नसत. त्यानंतर त्या व्यक्तीला या झालेल्या सर्व प्रकारामुळे वेगळ केलं जातं. त्यामुळे या व्यक्तीला खूप जवळच्या त्या व्यक्तीविषयी एक राग मनात वाढत जातो. जी व्यक्ती खूप जवळची होती. ती आता खूप दूर गेलेली असते. यामध्ये एक साधा विचार केला जात नाही कि "टाळी एका हाताने वाजत नाही"

मला हि गोष्ट लिहायचा कारण असं कि एका खूप जवळच्या मैत्रिणीच्या बाबतीत हेच झालं. आणि असं तिच्याच बाबतीत नाही पण खूप लोकांच्या बाबतीतही झालं असेल.

मनातल्या भावना जवळच्या व्यक्तीला सांगितल्या जातात ते नात वाढण्यासाठी… त्या भावनांचा विचित्र विचार करून व्यक्तीला स्वत:पासून  दूर करण्यात काय अर्थ असतो हेच उमगत नाही.

तीच व्यक्ती डोळ्यासमोर आली कि प्रेम वाटायचं आता त्याच व्यक्तीचा राग येतो असं होतं आणि मनावरचं ओझं, मनाजवळच्या माणसाचं फक्त त्या ठिकाणी तसचं राहत.

© ओंकार शिंदे 
 १५ जानेवारी २०१४

Thursday 2 January 2014

एक नातं वेगळं..... !!!


माझी शाळा घरापासून एक १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर... आणि शाळा म्हणजे एकदम गावात... आता पुणे शहर यामध्ये गाव कुठे आलं? पुण्यामध्ये जी ठिकाणे पूर्वीपासून होती,  त्या ठिकाणाला गाव म्हणतात. शाळा ही फ़क्त ५ वी ते १० वी पर्यंतच आहे. आता ज्युनियर  कॉलेज पण चालू झालंय.

मी नुकताच ५ वी मध्ये प्रवेश घेतला होता. नविन शाळा म्हणून तस कौतूक तर होतच. आई पहिल महीनाभर शाळॆत सोडायला आली. नंतर मी माझा शाळेत जायला लागलो. शाळेत जाण्यासाठी घरापासून दोन रस्ते जात होते. त्यातला एक मोठा रस्ता आणि एक छोटा रस्ता. खरं सांगायच तर तसा त्या रस्त्यांमध्ये असा काही फ़रक नव्ह्ता पण तरी त्याला बरेच जण अश्या दोन रस्त्यांनी ओळखायचे. आम्ही सगळे मित्र शक्यतो छोट्या रस्त्यानेच जायचो. असंच एक वर्ष निघून गेलं.

६ वी ला असताना माझ्याकडे सायकल आली. मी आता सायकलने शाळेत जायला सुरुवात केली. आता आम्ही सगळे मित्र मोठ्या रस्त्याने जायला लागलो . असच एक दिवस मी शाळेत जात असताना माझ्याबरोबर शाळेतले काही मित्र होते. शनिवार पेठ पोलीस चौकीच्या अलीकडे मोठ्या रस्त्याने जाताना एका मित्राने मस्ती केली. त्याने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढला. आणि त्याला प्रतित्तोर म्हणून तसाच आवाज आला. सगळे हसायला लागले. मला हा आवाज कुठून आला कळलच नाही

परत दुसय्रा दिवशी असच घडलं. पण आज माझ लक्ष होत की तो आवाज कुठून येतो. शनिवार पेठ पोलीस चौकीच्या अलीकडे एक प्रभात टि स्टॉल आहे. त्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक घर आहे. त्या घराच एक विशेष होतं. त्या घराच्या ज्या खिडक्या होत्या त्यांच्या एकदम खाली एक छोटी खिडकी होती. त्यालासुध्दा एक ग्रिल केलेलं होतं. ती खिडकी त्यांनी त्यांच्या त्या घरातल्या कुत्र्यासाठी केली होती.

शाळेतल्या मुलांना ते कळलं होतं दररोज कोण ना कोणीतरी येऊन कुत्र्याचा आवाज काढायचं आणि ते कुत्र त्याच्या त्या बारीक खिडकीपाशी येऊन खाली बघुन भुंकायचं. सगळी मुलं हसायची आणि निघुन जायची. असं खूप दिवस होत राहील. फ़क्त बदल एवढाच झाला की आवाज देणारी मुलं बदलत राहीली. नंतर नंतर आम्ही मित्रांनी तो आवाज करण सोडून दिलं पण दुसर कोणिसुध्दा तसा आवाज दिला आणि परत प्रतित्तोर म्हणुन तसाच आवाज आला की आम्हाला हसू यायचं. अशीच शाळेतली ६ वर्षे निघून गेली. नंतर पुढे कॉलेज आणि करीअर.

एक दिवस असच त्याच मोठ्या रस्त्याने जाताना एका मुलाने सायकलवरुन जाताना भूंकण्याचा आवाज काढला पण आज वेगळच घडलं. प्रतित्तोर म्हणुन ते कुत्र खिडकीपाशी आलच नाही. मन थोडं अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली. काही कळेनास झालं.

त्यानंतर दोन दिवसांनी मी माझ्या शाळेतल्या मित्रांना भेटलो. त्यांना तो घडलेला किस्सा सांगितला. त्यावर त्याने सांगितलं की मागच्या महीन्यात तो तिकडून जात असताना कोणितरी आवाज टाकला होता. पण कुत्र तिकडे आलच नाही. त्या घरातले एक आजोबा खिडकीपाशी आले आणि म्हणाले की " कुत्र आता जिवंत राहीलेलं नाही " आणि निघून गेले. आम्ही सगळे शांत झालो. खूप जवळची गोष्ट गेल्यासारखं झालं. कोणी काहीच बोलल नाही.

लहानपणी ज्या गोष्टी आम्ही मजा आणि मस्ती म्हणून त्या कुत्र्याशी करायचो. त्याचाशी एक वेगळच नातं झाल होतं. आणि ते लहान वयातल नांत अजून आम्हाला त्याची आठवण देत. आजही त्या रस्त्याने जाताना आम्ही एकदातरी त्या खिडकीकडे बघतो... आता फ़क्त एवढाच बदल झाला आहे कि ती खिडकी त्यांनी कायमस्वरूपी बंद केलेली आहे....

© ओंकार शिंदे 
२ जानेवारी २०१४

Saturday 21 December 2013

वेळ काही वर्षापुर्वीची, काही वर्षानंतरची


प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ कधी ना कधी येतच असते. आज लहान असणार बाळ उद्या शाळेत जायला लागतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न, मुले, आणि  रिटर्यमेंट म्हणजे म्हातारपण...

मला फ़क्त या सर्व साखळी मध्यल्या पहील्या आणि शेवटच्या म्हणजेच लहान बाळ आणि म्हातारपण या गोष्टींवर बोलायचयं

मला माहीत नाही की मी हा विषय का घेतला,  या आयुष्यातल्या या दोन्ही फ़ेज दिसताना वेगळ्या असल्यातरी त्यामध्ये अनेक प्रकारचं साम्य आहे.  तेच फ़क्त एका वेगळ्या प्रकारे समोर आणायचा प्रयत्न करतोय. कदाचीत या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीशी संबंधीत असताना वेगवेगळ्या असतील, पण एकंदरीत परिस्थितीवरुन हे लिहितोय.   

आपण लहान बाळ असताना आपल्याला काही कळत नसतं. आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी कुतुहलता असते. त्या गोष्टीला हात लावयला गेलो की घरातली मोठी व्यक्ती हात लावू देत नाही. तरीही आपण काही झालं तरी त्या गोष्टीला हात लावायचा पूर्ण प्रयत्न करतो. काहितरी होतं, आणि आपल्याला कळतं त्याला हात का लावू नकोस असं का सांगत होते . 

असच आपल्या आजी आणि आजोबांच्या बाबतीत होत नसेल का ? बरेच मित्र आणि मैत्रीनी बोलून जातात कि त्यांना कळत नाही का ( यामध्ये मी पण मोडतो काहि वेळेस )? अर्थात आजी आजोबा खूप अनुभवामधून गेलेले असतात तरी त्यांना ही गोष्ट समजत नसेल अस पण वाटणं सहाजीक आहे. एखादी गोष्ट घरात येते आपण त्यांना सांगतो त्या गोष्टीला हात लावू नका आणि नकळतं त्यांच्याकडून त्या गोष्टीला काहितरी होतं आणि आपण चिडून म्हणतो की " तुम्हाला सांगितल होतं ना की हात लावू नका." आपण लाहनपणी एखादी चूक केली की हे आजी आजोबा आपल्याशी असच वागले होते का? या गोष्टीचा विचार करायला हवा.

लहानपणी खूपवेळा आपण एखादी गोष्ट आवडली की ती पाहिजे यासाठी सारखे मागे लागायचो. आज हेच आजी आजोबा आपल्या मागे एकच गोष्ट घेऊन सारखे मागे लागले की आपली चिडचिड का होते ? जेवून घे, जेवून घे असं बोलून सारखे मागे लागतात या गोष्टीचा रागराग होतो. लहान असताना आपल्याच मागे पळत यांनी आपल्याला जेवायला घातलं होतं हे सुध्दा विसरून चालणार नाही.

आपण खूप वेळा ऐकतो की या बाळाला बोलायला खूप लागतं. त्याच्यासमोर कोणी नसेल तर त्याला रडू येतं, रहावत नाही. आज आपले आजी आजोबा एकटे घरी असतात त्यांना कसं वाटत असेल ? दिवसभर कोणीही बोलायला नसतं आपण घरी आल्यानंतर ते सारखे बोलत असतात. एकच वाक्य, एकच काम सारखं सांगतात. त्यात त्यांच कुठे चुकतं ? नंतर हे सारख सारख बोलण्याची त्यांना सवय होऊन जाते आणि या गोष्टीचा आपल्याला त्रास होऊ लागतो.

यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्यापेक्षा आपण चिडचिड जास्त करतो. एकदा त्यांची जागा विचारात घेऊन विचार केला तर या प्रश्नांची उत्तरं मिळतील कदाचीत... 

आज फ़क्त आपण या गोष्टीला म्हतारपणात येणार बालपण म्हणू शकू... एक लहान मुलगा म्हणून त्या बालपणाकडे बघितलं तर चिडचिड आणि रागराग होणार नाही

लहान बाळाची वेळ आपल्या आयुष्यात काही वर्षापुर्वी येऊन गेली आहे... आता वेळ आहे फ़क्त काही वर्षानंतरची...   


© ओंकार शिंदे 
२१ डिसेंबर २०१३