Saturday 21 December 2013

वेळ काही वर्षापुर्वीची, काही वर्षानंतरची


प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ कधी ना कधी येतच असते. आज लहान असणार बाळ उद्या शाळेत जायला लागतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न, मुले, आणि  रिटर्यमेंट म्हणजे म्हातारपण...

मला फ़क्त या सर्व साखळी मध्यल्या पहील्या आणि शेवटच्या म्हणजेच लहान बाळ आणि म्हातारपण या गोष्टींवर बोलायचयं

मला माहीत नाही की मी हा विषय का घेतला,  या आयुष्यातल्या या दोन्ही फ़ेज दिसताना वेगळ्या असल्यातरी त्यामध्ये अनेक प्रकारचं साम्य आहे.  तेच फ़क्त एका वेगळ्या प्रकारे समोर आणायचा प्रयत्न करतोय. कदाचीत या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीशी संबंधीत असताना वेगवेगळ्या असतील, पण एकंदरीत परिस्थितीवरुन हे लिहितोय.   

आपण लहान बाळ असताना आपल्याला काही कळत नसतं. आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी कुतुहलता असते. त्या गोष्टीला हात लावयला गेलो की घरातली मोठी व्यक्ती हात लावू देत नाही. तरीही आपण काही झालं तरी त्या गोष्टीला हात लावायचा पूर्ण प्रयत्न करतो. काहितरी होतं, आणि आपल्याला कळतं त्याला हात का लावू नकोस असं का सांगत होते . 

असच आपल्या आजी आणि आजोबांच्या बाबतीत होत नसेल का ? बरेच मित्र आणि मैत्रीनी बोलून जातात कि त्यांना कळत नाही का ( यामध्ये मी पण मोडतो काहि वेळेस )? अर्थात आजी आजोबा खूप अनुभवामधून गेलेले असतात तरी त्यांना ही गोष्ट समजत नसेल अस पण वाटणं सहाजीक आहे. एखादी गोष्ट घरात येते आपण त्यांना सांगतो त्या गोष्टीला हात लावू नका आणि नकळतं त्यांच्याकडून त्या गोष्टीला काहितरी होतं आणि आपण चिडून म्हणतो की " तुम्हाला सांगितल होतं ना की हात लावू नका." आपण लाहनपणी एखादी चूक केली की हे आजी आजोबा आपल्याशी असच वागले होते का? या गोष्टीचा विचार करायला हवा.

लहानपणी खूपवेळा आपण एखादी गोष्ट आवडली की ती पाहिजे यासाठी सारखे मागे लागायचो. आज हेच आजी आजोबा आपल्या मागे एकच गोष्ट घेऊन सारखे मागे लागले की आपली चिडचिड का होते ? जेवून घे, जेवून घे असं बोलून सारखे मागे लागतात या गोष्टीचा रागराग होतो. लहान असताना आपल्याच मागे पळत यांनी आपल्याला जेवायला घातलं होतं हे सुध्दा विसरून चालणार नाही.

आपण खूप वेळा ऐकतो की या बाळाला बोलायला खूप लागतं. त्याच्यासमोर कोणी नसेल तर त्याला रडू येतं, रहावत नाही. आज आपले आजी आजोबा एकटे घरी असतात त्यांना कसं वाटत असेल ? दिवसभर कोणीही बोलायला नसतं आपण घरी आल्यानंतर ते सारखे बोलत असतात. एकच वाक्य, एकच काम सारखं सांगतात. त्यात त्यांच कुठे चुकतं ? नंतर हे सारख सारख बोलण्याची त्यांना सवय होऊन जाते आणि या गोष्टीचा आपल्याला त्रास होऊ लागतो.

यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्यापेक्षा आपण चिडचिड जास्त करतो. एकदा त्यांची जागा विचारात घेऊन विचार केला तर या प्रश्नांची उत्तरं मिळतील कदाचीत... 

आज फ़क्त आपण या गोष्टीला म्हतारपणात येणार बालपण म्हणू शकू... एक लहान मुलगा म्हणून त्या बालपणाकडे बघितलं तर चिडचिड आणि रागराग होणार नाही

लहान बाळाची वेळ आपल्या आयुष्यात काही वर्षापुर्वी येऊन गेली आहे... आता वेळ आहे फ़क्त काही वर्षानंतरची...   


© ओंकार शिंदे 
२१ डिसेंबर २०१३

Wednesday 4 December 2013

मनातली हरवलेली हक्काची जागा...!!!


प्रत्येकाचं त्याच्या मनाच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीसाठी काही काही ना काही नात असतं. ते नातं जवळचा मित्र किंवा आई-वडिल किंवा आयुष्यभर असणारा कोणी साथीदार यांच्याशी असो. प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनातल्या गोष्टी सांगत असतो. यामधल्या काही गोष्टी मनाच्या जवळ असतात तर काही गोष्टींचा आणि मनाचा काही संबंध पण नसतो, पण तरीही प्रत्येकाला या गोष्टी कोणाला तरी सांगायची, शेअर करायची खूप इच्छा असते. या गोष्टी म्हणजे प्रत्येकाच्या मनातल्या भावना, विचार, सु:ख, दु:ख यांच्याशी निगडीत असतात, आणि या सर्व गोष्टी शेअर करायला ही मनाजवळची माणसं हक्काची असतात. अशी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. 

आपल्या मनाच्या जवळ किती मनं जोडली गेली आहेत त्यापेक्षा आपण किती मनांना जोडलं गेलो आहे हे खूप महत्वाच असतं. 

या जवळच्या नात्यांमध्ये खूप वेळा असं होतं की आपल्याला माहीत असत की समोरची व्यक्ती ही आपल्या जवळची आहे ति तिच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगते. पण अचानक हळू हळू त्या व्यक्तीच्या मनापासून आपलं मन दुर गेलेले असतं. हे सगळ कधी होतं, कसं होतं काहीच कळत नाही. फ़क्त एक दिवस अचानक जाणिव होते कि ही व्यक्ती मला नेहमी तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगायची आणि आज मला या गोष्टी कोणा तिसऱ्याकडून समजतात. 

असं का झालं याचा विचार केला की वेगवेगळे मुद्दे डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये प्रत्येकाचा ईगो असेल किंवा एकमेकांना वेळ देणं शक्य नसेल अशी अनेक कारणं असू शकतात. या सर्व गोष्टींच मूळ हे एकाच ठिकाणी येतं ते म्हणजे की त्या व्यक्तीला असं वाटत की तुम्ही त्या व्यक्तीला आता खूप कमी स्पेस देत आहात.

ज्या व्यक्तीच्या आपण खूप जवळ होतो ती व्यक्ती आज अचानक पहिल्यासारखी आपल्या मनाजवळ नाही, आणि ही गोष्ट आपल्याला स्वत:च्या आणि आई-बाबांच नातं विचारात घेतलं तर प्रकर्षाने जाणवेल. आईशी ज्याप्रकारे मन मोकळ करुन बोलता येत, तेवढ बाबांशी बोलता येत नाही. 

हे मना जवळच नातं तुटण्यामागे दुसरं काही कारण नसून फ़क्त त्या व्यक्तीची तुमच्या आयुष्यात एक स्वत:ची हक्काची जागा कमी होताना दिसते आणि ती व्यक्ती दुरावली जाते. 

आपण खूपवेळा म्हणतो एखाद्या व्यक्तीची आता आपल्या मनात जागा नसते. ती खरच नसते ? जर नसते तर मग असते कुठे ? आणि असते तर मग कळत का नाही.? आपण हे न कळण्याचं कारण आपण ठरवलेलं असतं कि या व्यक्तीची आपल्या मनात काहीच जागा नाही.

आयुष्यात प्रत्येकाच्या मनात प्रत्येक मनाजवळच्या व्यक्तीसाठी कोठे ना कोठे जागा असतेच आणि ही जागा कोणीही कधीच घेऊ शकत नाही. आपण जरी कितिही म्हणत असलो की या व्यक्तीचा माझ्या आयुष्यात आता काहीही संबंध उरलेला नाही तरी त्या व्यक्तीच्या आठवणी, ते क्षण, ती मैत्री त्या मनाच्या एका कोपय्रात दडलेल्या असतात. तिच त्या व्यक्तीची तुमच्या मनातली हक्काची जागा असते. 

फरक फक्त एवढाच असतो की आता त्या हक्काच्या जागेतली वेळेनुसार स्पेस फ़क्त कमी झालेली असते.

© ओंकार शिंदे 
४ डिसेंबर २०१३

Sunday 10 November 2013

एक विचार सगळ्यांच्या मनातला...!!!

काही गोष्टी खूप अचानकपणे घडतात. आणि बराच वेळ कळतच नाही की काय चाललयं. नक्की काय होणार होतं किंवा काय अपेक्षित होतं यापेक्षा काही वेगळच घडतं. हे सगळ का घडलं याच उत्तर शोधलं की यामध्ये फ़क्त एकच व्यक्ती किंवा एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे आपल मन..... 


प्रत्येकाच्या मनात एखाद्याविषयी काहीना काही  भावना असतेच.... मग ती कुठलीही असो... प्रेम, राग, द्वेष.... पण एखाद्याविषयी असणारी प्रेमाची भावना बदलली आणि तिकडे राग उभा राहीला तर… ? तो राग त्या प्रेमाला ठेवतच नाही.

शेवटी काय महत्वाच ते पुर्वीपासूनचं प्रेम का आत्ता आलेला राग ...??? ते प्रेमच महत्वाच असतं तरी आपल्या डोक्यातला तो राग आपल्याच मनाला रागाची भुरळ घालतो... तर मग त्या रागाला बाजूला सारून आपल मन आपण प्रेमाकडे का वळवू शकत नाही...???

तसच आपला विश्वास सुध्दा हा पण आपल्या जवळच्या व्यक्तिवर  खूप असतो... आणि अचानक आपल्याला त्या व्यक्तिविषयी काही बाहेरून कळलं तर मनाची अस्वस्थता वाढते... ती बाहेरची व्यक्ती तिचा काहीच संबंध नाही... तरी त्यावेळेस त्या व्यक्तीवर आपला सगळ्यात जास्त विश्वास.... आणि नंतर एका जवळच्या व्यक्तीपासून दूर जाण... हे कितपत योग्य असतं??? 

आपल्याला हे माहीत असतं आपण करतोय ते चूकिचे आहे... तरी आपण आपल्या मनाला समजावू शकत नाही.... एकमेकांना जोडलेली दोन मनं एकदम वेगळी होतात... आणि हे सुध्दा प्रत्येक नात्यात होत... ते नातं पहील्या प्रेमाच असो किंवा मैत्रीच.... 


या गोष्टीला अजून काय कारण असू शकेल??? आपल्या मनात असणाय्रा अपेक्षा.... तर मग आपण आपल्या अपेक्षा आपल्याच जवळच्या व्यक्तीबरोबर ठेवल्या तर काय हरकत आहे हा प्रश्न परत मनात आलाच.... शेवटी हा सगळा आपल्या मनाचाच खेळ... या मनाला कस समजवाव हे कळतचं नाही.... आणि आपण आपल्या मनाला फ़सवू पण शकत नाही.... फ़क्त या गोष्टीला आपण वेळ द्यायचा.... कारण आपल्याला सावरायला थोडा वेळ लागतोच.... आपल्या मनाला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली असतेच... फ़क्त होणारा त्रास सहन करायचा असतो... असं सगळं करण्यापेक्षा आपणच आपल्या मनाला समजवलं तर ??? मनातला राग, अविश्वास, ईगो बाजूला काढला तर ते स्वत:ला त्रास होण्यापेक्षा अधिक चांगल नाही का... प्रत्येक व्यक्ती हि मुळाताच चांगली असते.... फ़क्त आपल्या मनात त्या व्यक्तीच्या बाबतीत काय भावना आहेत ते शेवटी महत्वाचं.....

© ओंकार शिंदे
१० नोव्हेंबर २०१३