प्रत्येकाचं त्याच्या मनाच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीसाठी काही काही ना काही नात असतं. ते नातं जवळचा मित्र किंवा आई-वडिल किंवा आयुष्यभर असणारा कोणी साथीदार यांच्याशी असो. प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनातल्या गोष्टी सांगत असतो. यामधल्या काही गोष्टी मनाच्या जवळ असतात तर काही गोष्टींचा आणि मनाचा काही संबंध पण नसतो, पण तरीही प्रत्येकाला या गोष्टी कोणाला तरी सांगायची, शेअर करायची खूप इच्छा असते. या गोष्टी म्हणजे प्रत्येकाच्या मनातल्या भावना, विचार, सु:ख, दु:ख यांच्याशी निगडीत असतात, आणि या सर्व गोष्टी शेअर करायला ही मनाजवळची माणसं हक्काची असतात. अशी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.
आपल्या मनाच्या जवळ किती मनं जोडली गेली आहेत त्यापेक्षा आपण किती मनांना जोडलं गेलो आहे हे खूप महत्वाच असतं.
या जवळच्या नात्यांमध्ये खूप वेळा असं होतं की आपल्याला माहीत असत की समोरची व्यक्ती ही आपल्या जवळची आहे ति तिच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगते. पण अचानक हळू हळू त्या व्यक्तीच्या मनापासून आपलं मन दुर गेलेले असतं. हे सगळ कधी होतं, कसं होतं काहीच कळत नाही. फ़क्त एक दिवस अचानक जाणिव होते कि ही व्यक्ती मला नेहमी तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगायची आणि आज मला या गोष्टी कोणा तिसऱ्याकडून समजतात.
असं का झालं याचा विचार केला की वेगवेगळे मुद्दे डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये प्रत्येकाचा ईगो असेल किंवा एकमेकांना वेळ देणं शक्य नसेल अशी अनेक कारणं असू शकतात. या सर्व गोष्टींच मूळ हे एकाच ठिकाणी येतं ते म्हणजे की त्या व्यक्तीला असं वाटत की तुम्ही त्या व्यक्तीला आता खूप कमी स्पेस देत आहात.
ज्या व्यक्तीच्या आपण खूप जवळ होतो ती व्यक्ती आज अचानक पहिल्यासारखी आपल्या मनाजवळ नाही, आणि ही गोष्ट आपल्याला स्वत:च्या आणि आई-बाबांच नातं विचारात घेतलं तर प्रकर्षाने जाणवेल. आईशी ज्याप्रकारे मन मोकळ करुन बोलता येत, तेवढ बाबांशी बोलता येत नाही.
हे मना जवळच नातं तुटण्यामागे दुसरं काही कारण नसून फ़क्त त्या व्यक्तीची तुमच्या आयुष्यात एक स्वत:ची हक्काची जागा कमी होताना दिसते आणि ती व्यक्ती दुरावली जाते.
आपण खूपवेळा म्हणतो एखाद्या व्यक्तीची आता आपल्या मनात जागा नसते. ती खरच नसते ? जर नसते तर मग असते कुठे ? आणि असते तर मग कळत का नाही.? आपण हे न कळण्याचं कारण आपण ठरवलेलं असतं कि या व्यक्तीची आपल्या मनात काहीच जागा नाही.
आयुष्यात प्रत्येकाच्या मनात प्रत्येक मनाजवळच्या व्यक्तीसाठी कोठे ना कोठे जागा असतेच आणि ही जागा कोणीही कधीच घेऊ शकत नाही. आपण जरी कितिही म्हणत असलो की या व्यक्तीचा माझ्या आयुष्यात आता काहीही संबंध उरलेला नाही तरी त्या व्यक्तीच्या आठवणी, ते क्षण, ती मैत्री त्या मनाच्या एका कोपय्रात दडलेल्या असतात. तिच त्या व्यक्तीची तुमच्या मनातली हक्काची जागा असते.
फरक फक्त एवढाच असतो की आता त्या हक्काच्या जागेतली वेळेनुसार स्पेस फ़क्त कमी झालेली असते.
४ डिसेंबर २०१३